‘श्रीमंत योगी’ अशा शब्दांत समर्थ रामदास स्वामींनी ज्यांचे वर्णन केले, अशा छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यांना त्रिवार मुजरा!
शून्यातून विश्व निर्माण करून मोठी साम्राज्ये प्रस्थापित करणारे योद्धे जगात अनेक झाले; पण शिवरायांचे स्थान वेगळेच. कारण त्यांनी एका बाजूला आदिलशाही, दुसऱ्या बाजूला निजामशाही आणि उत्तरेत महाशक्तिशाली मोगलाई या शक्तींशी सतत झुंज देत हिंदवी स्वराज्याची स्थापना तर केलीच; पण त्यांनी हे कर्तृत्व केवळ स्वत:ला ‘महाराज’ म्हणवून घेण्यासाठी गाजवले नाही, तर त्यांना ‘रयतेचा राजा’ व्हायचे होते. परकीय जुलमाखाली तीनशे वर्षे भरडल्या गेलेल्या व पिचलेल्या रयतेला ‘स्वत:चे राज्य’ मिळावे म्हणून शिवाजी राजांनी हयातभर घोड्यावरच मांड ठोकली.
वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधणाऱ्या राजांपाशी बलदंड व प्रशिक्षित सैनिक नव्हते. म्हणून त्यांनी मावळ प्रांतातील मावळ्यांना हाताशी घेतले व स्वराज्याची मोहीम सुरू केली. त्यांनी किल्ल्यांमागून किल्ले व गड सर करून आपला दरारा तर प्रस्थापित केलाच, शिवाय त्याच काळात समुद्रमार्गे कोकणच्या किनारपट्टीवर शिरकाव करून आपली दहशत निर्माण करू पाहणाऱ्या समुद्री चाच्यांचा व पोर्तुगीज, टोपीकर आदी दर्यावर्दींवर वचक बसवण्यासाठी अरबी समुद्रात दुर्गही निर्माण केले.
शिवाजी महाराजांचे प्रशासकीय कौशल्य व दूरदृष्टी यांचे दर्शन त्यांच्या प्रत्येक कारवाईत स्पष्टपणे दिसत राहते. राजधानी रायगडावर आणण्यापासून दूर सुरतेची बाजारपेठ लुटण्यापर्यंत आणि आग्याप्हून सुटकेच्या धाडसापासून शंभू महाराजांना शासन करण्यापर्यंत प्रत्येक कृतीत महाराजांमधला ‘छत्रपती’ जागा असल्याचे दिसत राहते.
आज आपण महाराजांची जयंती साजरी करतो; पण त्यांच्या जीवन-कार्यापासून काहीच शिकत मात्र नाही, याचे वैषम्य वाटते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मानपूर्वक परत पाठवले. सध्या महिलांवरील अत्याचार व बलात्कारांच्या बातम्यांनी कान किटले आहेत. महाराजांनी मुसलमानांना आपल्या सैन्यात विश्वासाची पदे दिली. सध्या कर्तृत्वापेक्षा जन्माने मिळालेला धर्म व जात कोणती यावर पदे व प्रतिष्ठा ठरते आहे. देशद्रोह्यांसाठी कडेलोटाची शिक्षा सुनावणाऱ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात अतिरेकी म्हणून फासावर गेलेल्या युसुफ मेमनच्या अंत्ययात्रेसाठी वाहतूक थांबवावी लागत आहे.
अशा वेळी ‘आज महाराज असते तर...’ हा प्रश्न मनात घोंघावू लागतो.
महाराजांचे स्मरण करताना त्यांच्या ठायीच्या अनंत गुणांपैकी एकाची तरी पाखर आमच्या महाराष्ट्रावर होऊ द्या, हीच प्रार्थना!
- भारतकुमार राऊत